गणेश भक्तांनी कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन करावे
(सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांचे आवाहन)

गणेश भक्तांनी कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन करावे
(सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांचे आवाहन)
रघुनाथ थोरात
अलीकडील काळात नदी व विहिरींचे वाढते जलप्रदूषण टाळण्यासाठी उंब्रज परिसरातील गणेश भक्तांनी पार्वती नगर येथील कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन कै रामचंद्र दिनकरराव जाधवराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील,सचिव सुजाता पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ उंब्रजचे अध्यक्ष विश्वनाथ केंजळे, सचिव प्रकाश मसुगडे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष युवराज पाटील, सचिव प्रशांत कुंभार यांनी केले आहे. याबाबत कमलाकर पाटील म्हणाले की, गणेशोत्सव हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. ज्या भक्तीभावाने आपण गणेशाची प्रतिष्ठापना करतो. त्याच भक्तीभावाने बाप्पांचे विसर्जनही करतो.परंतु,सध्या जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मूर्ती बनवण्यासाठी केमिकलयुक्त रासायनिक रंगद्रव्ये वापरली जातात. विसर्जनानंतर हे रंग नदीच्या,विहिरीच्या पाण्यात मिसळतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. तसेच निर्माल्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होते. त्यामुळे गत दहा वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी आम्ही कृत्रिम विसर्जन कुंड तयार करीत आहोत. त्यासाठी गणेशभक्तांनी पाटण पंढरपूर राज्य मार्गावर असलेल्या पार्वतीनगर येथे गणेश विसर्जनासाठी यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांनी केले आहे.




