
नाणेगाव(खुर्द) येथे आंब्याच्या रोपांची अज्ञातांकडून कत्तल
(मिरचीची रोपेही उपटली)
रघुनाथ थोरात
चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द,ता.पाटण येथील प्रगतशील शेतकरी किशोर चव्हाण यांनी गट नंबर ३९५ मध्ये तीन वर्षांपूर्वी लावलेल्या ६८ पैकी ५० केशर जातीच्या आंब्याच्या रोपांची अज्ञाताने कत्तल नुकसान केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत अज्ञाताविरुध्द रीतसर तक्रार चाफळ पोलिसांत दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द,ता.पाटण येथील प्रगतशील शेतकरी किशोर चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी गट नंबर ३९५ मध्ये मोठ्या कष्ठाने आपल्या मालकीच्या पन्नास गुंठे क्षेत्रात सुमारे ६८ केशर जातीची आंबा रोपे लावली होती.तर याच क्षेत्रात मिरचीची रोपेही लावलेली होती. सोमवारी रात्रीचे सुमारास अज्ञातांनी पूर्ण वाढ झालेली ५० आंब्याची रोपे अक्षरशः उपटून टाकत तसेच मोडून टाकत अतोनात नुकसान केले आहे. या निंदनीय प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.संबधीत शेतकऱ्याचा गावात कोणाबरोबर कसलाही वाद नसताना हा प्रकार नेमका कुणी केला असेल याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. पोलीस यंत्रणेने अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.




